मी
आपले विचार
आपल्या मनाच्या भावना
कधी मांडूच शकलो नाही
तुझ्यासमोर
अलंकृत शब्दात.
पण तू
तुही
कधी वाचून घेतले नाही
माझ्या चेहऱ्यावरील भाव
ज्यांना अलंकारांची गरजच नसते मुळी.
मी भोळा
मला सुध्दा
कळलेच नाही कधी
मनातील भाव
शब्दात व्यक्त कसे करतात ते
मला वाटायचे
तू माझा चेहरा वाचशील
आणि
माझ्या मनाला समजून घेशील
मी तुझ्या प्रतिसादाची वाट बघत राहिलो
आणि
एके दिवशी मला तुझ्या लग्नाची वार्ता कळली
आणि माझे मन विषण्ण झाले.
तेव्हा हि मला शब्दात
आपले दुख व्यक्त करता आले नाहीच
फक्त दोन अश्रू
डोळ्यातून वाहून गालावर घरंगळले
आणि मी
शब्द शोधात राहिलो....